1. पालघर जिल्ह्याची निर्मिती
1 ऑगष्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातील देशातील सर्वात मोठ्या नागरी सागरी टेकडीचा भाग विभागला गेला आणि महाराष्ट्रातील 36 वा नवीन जिल्हा, पालघर अस्तित्वात आला.
2. इतिहास
पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व जव्हार तालुक्यांना सोनेरी इतिहासाचा वारसा आहे. वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचे अधिराज्य होते. पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचे साम्राज्य सुरुंग लावत मराठी झेंडा रोवला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सन 1942 चे चाले जाओ आंदोलन यामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात 14 ऑगष्ट 1942 रोजी उठाव झाला होता.
या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते:
- सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे
- नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर
- पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी
- मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी
- शिरगावचे सुकुर गोविंद मोरे
या शहीदांच्या स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे.
तसेच सन 1930 चा मिठाचा सत्याग्रह सुरु झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटीपासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती.
जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते. तेथील राजे मुकणे संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही इतिहासाची साक्ष देत आहे.
3. सांस्कृतिक वारसा
जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे.
वारली चित्रकारी आदिम काळापासून, म्हणजे साधारणपणे 1100 वर्षांपासून जतन केलेली आहे. या चित्रकलेमध्ये आदिवासी समाजाच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन जीवनातील प्रसंग उदा. लग्न, नृत्य, विविध सण, निसर्गातील घडामोडी चित्ररूपाने दाखविल्या जातात.
ही चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू उदा. माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रश वापरून काढली जातात. ही कला भारतात तसेच परदेशातही मागणी असलेली आहे.
संस्कृती आणि वारसा लिंक:
https://palghar.gov.in/संस्कृती-आणि-वारसा/
4. भौगोलिक माहिती
पालघर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 4696.99 चौ.कि.मी. असून सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना जिल्ह्याला लाभली आहे.
- सागरी किनारा लाभलेले: डहाणू, पालघर, वसई
- औद्योगिकदृष्ट्या विकसित: वाडा, पालघर
- अतिदुर्गम डोंगरी भाग: जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी
पश्चिमेला 70 कि.मी. अरबी समुद्र किनारा असून वैतरणा, उल्हास, देहर्जे, पिंजाळ, सूर्यावतानसा या प्रमुख नद्या वाहतात. हवामान उष्ण व दमट असून सरासरी पर्जन्यमान 2000 ते 3500 मि.मि. आहे.
5. औद्योगिक माहिती
पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना जंगलपट्टी, बंदरपट्टी व पठारी प्रदेश अशी आहे.
- डोंगराळ भाग (जव्हार, मोखाडा, विक्रमगड): शेती, भात, नागली, हळद
- बंदरपट्टी भाग: मासेमारी, मासे सुकविणे, कोळंबी संवर्धन
- पठारी भाग: कापड, रासायनिक, अभियांत्रिकी, स्टील उद्योग
- एमआयडीसी, तारापूर
- बोईसर (टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, विराज स्टील)
- वाडा, वसई, विरार, नालासोपारा
6. प्रशासकीय माहिती
- तालुके: 8
- पंचायत समित्या: 8
- ग्रामपंचायती: 473
- पेसा ग्रामपंचायती: 415
- लोकसंख्या (2011): 29,95,428
तारापूर येथे देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.
7. पर्यटन विषयक माहिती
- जव्हार, खोडाळा, सुर्यामाळ
- अर्नाळा किल्ला, केळवा किल्ला, गंभीरगड
- केळवा, डहाणू, बोर्डी, अर्नाळा, सातपाटी समुद्रकिनारे
पर्यटन स्थळे लिंक:
https://palghar.gov.in/पर्यटन-स्थळे/
समुद्रकिनारे लिंक:
https://palghar.gov.in/समुद्रकिनारा/